इंडीयाज गॉट टॅलंट....

टी.वी. अन मी हे फ़ार दुर्मिळ असा योग आहे.चुकुन कधी कधी टी.वी. पाहतो.पाहिल तरी म्युजिक,डिस्कवरी,नॅशनल जिओग्राफ़ी इकडे पडीक असतो.रियल्टी शो या प्रकारच्या तर वाटेला पण जात नाही.पण नुकताच कलर्स वर "इंडीयाज गॉट टॅलंट" नावाचा कार्यक्रम पाहण्यात आला.

खरच आपला भारत गुणवत्तेची खाण आहे. भारतातल्या प्रत्येक काना कोपर्‍यात अस्सल गुणवान हिरे आहेत.खालील दोन विडीयो पाहा या अशा गुणवत्तेच्या जोरावर आपण उद्याच्या उज्ज्वल भविष्याच स्वप्न पाहिला काहीच हरकत नाही.

विनोद ठाकुर ...हा अवघा २१ वर्षाचा तरुण दोन्ही पायांनी अपंग...घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची...याचे वडील चालक तर आइ गृहिणी आहे. धडधाकट तरुणाला लाजवेल असा याचा उत्साह. त्याच्या फ़क्त डोळ्यात पहा...किती स्वप्न आहेत...आपण अपंग आहोत या गोष्टीचा त्याने कुठेही सहानभुती मिळवण्यासाठी उपयोग केला नाही.त्याचा नाच बघताना तर विश्वासच बसत नाही.

खरच कोठुन आणत असेल हा एवढा उत्साह?? निराशेचा कुठेही मागमुस ना्ही......स्वतःच्या अस्तिवाची ही लढाइ तेवढ्याच धैर्याने चालु आहे.





आता हा खालचा दुसरा विडीयो पहा.ही सर्व मुलं एका वस्तीवरील आहे.यांनी भंगारातुन सगळी संगीत वाद्य बनवली आहेत.यातील बहुतेक मुल ही शाळेत जातच नाही अन कोणीही संगीताच शिक्षण घेतलेल नाही.









 मला खर तर रियल्टी शो या प्रकाराचा खुप तिटकारा आहे पण हे पाहिल्यावर वाटत की या कार्यक्रमाद्वारे या अशा लोकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मंच मिळाला.

भारतात अशे कि्ती तरी लोक असतील की ज्यांच्याकडे अशीच गुणवत्ता असेल पण केवळ योग्य मार्ग न मिळाल्यामुळे कुठे तरी भरकटले असतील किंवा जगापुढे कधी येउ शकत नाही.

खर तर ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे...अश्या गुणवान लोकांना शोधुन त्यांना उत्तम सुविधा व संधी  देणं गरजेच आहे.पण अस काही विधायक काम केल तर ते सरकार कसल???

खा...खा..खादुवासी!!

 माथा टीप: सदर लिखाण हे केवळ काल्पनिक आहे. यातील व्यक्तींचा जिवंत,मृत,तृप्त,  अ-तृप्त अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वांशी दुरान्वये संबंध नाही. तस असल्यास तो केवळ योगा योग समजावा.


संपुर्ण जगाला एका नवीन जमातीच्या शोधाने अचंबीत केल आहे.या जमातीमधील मानव सदृश्य व्यक्तींच वैशिष्ट म्हणजे यांची "पचन शक्ती".या जमाती मधील व्यक्तींच्या पचन शक्तीने संपुर्ण जगातील शास्त्रज्ञ अचंबीत झाले आहेत.ही जमात  दृश्य व अदृश्य,घन,द्रव,वायु,नैसर्गिक,कृत्रिम कोणत्याही प्रकारच्या वस्तु खाउ शकतात.यांना खाण्यासाठी कोणत्याही प्रकारच पथ्य नाही. त्याहुन महत्वाच म्हणजे त्या अतिशय उत्तमरित्या पचवु शकतात.या जमातीला बद्ध्कोष्टता,अपचन इ. रोग की जे पचनाशी संबधीत आहे याचा कोणताही प्रकारचा त्रास होत नाही.

ही जमात प्रामुख्याने आशिया खंडातील "भारत" देशी सापडते.या जमातीमधील व्यक्तींना ओळखण्याची सर्वात सोपी खुण म्हणजे यांच्या चेहर्‍यावरील साळसुदपणाचा भाव.ह्या जमातीमधील लोक भारत देशातील काना कोपर्‍यात आढळतात.उदारनिर्वाहासाठी यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे "समाजसेवा".समाजसेवेच्या माध्यमातुन ते इतर समुदायातील लोकांच प्रतिनिधीत्व करुन स्वतःच व कुटुंबाच पोट भरतात."एका मेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" या उक्ती प्रमाणे या समुदायातील लोक एकमेकांना सतत सहकार्य करत आयुष्य कंठीत असतात.महाभारतात ज्याप्रमाणे अर्जुनाला लक्ष्य भेद करताना फ़क्त पोपटाचा डोळा दिसत होता अगदी त्याप्रमाणेच यांना हे जिथे जातील तिथे फ़क्त त्यांच "खाणे"एवढच एक लक्ष्य असतं.जगातील शास्त्रज्ञानी या जमातीला "खादुवासी" असे नामकरण केले आहे.या जमातीमधील तीन प्रतिनिधींचा जगभरातील शास्त्रज्ञानी प्रातिनिधीक संशोधनपर अभ्यास केला त्याचा तपशील खालील प्रमाणे.

सर्वप्रथम अभ्यास केलेला प्रतिनिधी सध्या खेळाच्या माध्यमातुन समाजाची सेवा करतो.अत्यंत साध राहणीमान,चेहर्‍यावर तोच गरीबपणाचा साळसुद भाव.अन इतका गरीब की दाढी करावयास सुद्धा सध्याच्या महागाइच्या काळात याला परवडत नाही.याच्या उर्ध्व ढेकराच्या गंधाचा (सहसा खाउन झाल्यानंतर ही जमात कधीच उर्ध्व किंवा अर्ध्व ढेकर देत नाही कधी तरी चुकुन सापडले जातात) नमुना तपासला असता त्यामध्ये खेळाची मैदाने,खेळासाठी लागणारी साधने,सुविधा अश्या खुप सार्‍या गोष्टी आढळल्या.अजुन दीर्घ तपास केला असता बी.आर.टी. नावाचा एक संपुर्ण प्रकल्प, रस्ते, उड्डाण पुल अस खुप काही आढळल.पण सदर प्रतिनिधी ने हे सर्व थोतांड असुन आपण अस काही खाल्लच नाही असा दावा केला आहे.

यानंतरचा प्रतिनिधी हा "विहार" या अत्यंत गरीब प्रदेशातुन आलेला होता.अतिशय गोंडस अन मिश्कील अस हे व्यक्तीमत्व.नावाजलेल्या संस्थांमधुन हे व्यवस्थापनाचे धडे देतात.यांच्या उर्ध्व ढेकरातुन गुरांच्या चार्‍याचा अगदी घमघमाट होता की शास्त्रज्ञाना त्याचा अभ्यास करण सुद्धा अवघड झाल.चार्‍यासारखी गोष्ट पचवण्यासाठी हे नक्की काय करतात हे मात्र एक गुढच राहिल आहे.यांच्या अभ्यासाठी गेलेले शास्त्रज्ञ हे सध्या "म्हशी व त्यांचे कुटुंबनियोजन" यावरील संशोधनात व्यग्र असल्याने हा तपशील नेहमीप्रमाणे अपुर्ण राहिला.

सर्वात शेवटी आलेल्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांच्या कौशल्याचा कस लागला.गरीब शेतकरी कुटुंबातील सर्वांचा "जाणता राजा" असलेला, गोर गरीब जनतेचा कैवारी, भाग्यविधाता....अस खुप काही.अत्यंत शांत,मृदु,मितभाषी....न बोलताच आपला पराक्रम गाजवणारा.यांच्या मनात काय चालु आहे कोणीच अगदी स्वतः ते पण सांगु शकत नाही.यांचा अभ्यास जेव्हा चालु केला तेव्हा शास्त्रज्ञांपुढे अभ्यास कसा करावा हा यक्ष प्रश्न होता. कारण हे खातात कधी हे समजतच नाही,कोणत्याही प्रकारचा अर्ध्व किंवा उर्ध्व ढेकरही देत नाही.फ़क्त हे खात आहेत हे जाणवत...त्याचा आभास होतो. यांनी खाल्लय हे साक्षात ब्रम्हदेव जरी आला तरी त्याला सिद्ध करण अशक्य आहे.या समाजसेवेचं अनुग्रह त्यांनी त्यांच्या सर्व क्षेत्रातील शिष्यांना दिला आहे. शिक्षण,बांधकाम,आरोग्य,उद्योग,शेती,खेळ (सर्व प्रकारचे मैदानी व बैठे) या सगळ्या क्षेत्रात यांचे अनुयायी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.सगळीकडेच यांच्या खाण्याचा अदृश्य असा अस्तित्वाचा ठसा आहे.

सरतेशेवटी यांच्या अभ्यासासाठी शास्त्रज्ञानी नवीन प्रगत अशा तंत्राच्या साहय्याने नवीन यंत्र तयार केल की ज्या द्वारे यांनी काय काय खाल्लय हे पाहता येउ शकत होत.हे यंत्र जेव्हा या "साहेबां"ना लावल तेव्हा क्षणातच संगणकावरील सर्व गुप्तनीय माहिती गायब झाली व संगणकाच्या पडद्यावर काळोखाच्या पार्श्वभुमीवर "Permanat Error" चा संदेश झळकला.

यानंतर सर्व शास्त्रज्ञ बेशुध्द व "साहेब" व्यक्तीमत्व गालातल्या गालत स्मित हास्य करत होत!!!

येळकोट..येळकोट...जय मल्हार!!!

कुलाचार,कुलधर्म,कुलदैवत या सर्व प्रकारांशी लग्नापुर्वी दुर दुर पर्यंत संबंध नव्हता.गुरुवारी "स्वामी समर्थ मठ" सोडला तर बाकी इतर कोणत्याच ठिकाणी मी काही फ़िरकत नाही.आइ बाबा जातात म्हणुन प्रत्येक नवरात्रात निमगिरी ला आमच्या कुलदेवीला जायचो.ते पण मला तो परीसर खुप आवडतो म्हणुन अन सर्वात महत्वाच म्हणजे घरचे सर्व जण एकत्र असतात त्यामुळे मस्त मजा येते.तुळजापुर, जेजुरी इथे लहानपणी कधी तरी गेल्याच आठवतय.

लग्नानंतर कुलधर्माप्रमाणे जेजुरी इथ जाण क्रमप्राप्त होत.आपण फ़क्त जेजुरी ला न जाता कडेपठारला पण जाउ या असा प्लॅन झाला.ठरल्याप्रमाणे पहाटे घरुन जेजुरीच्या दिशेने प्रयाण केल.सकाळी लवकरच आम्ही कर्‍हा नदीवर पोहचलो.स्वागताला पार्किंगची पावती घेउन उभा होता.
 मी : हे पार्किंग देवस्थानच की सरकारच?
 तो:  हे खाजगी पार्किंग आहे.
 मी: अरे पण हे तर नदी पात्र खाजगी कस?
 तो:(च्यायला लय शहाण दिसतय...मनात) ओ तुम्हाला जायच असेल तर पावती फ़ाडावी लागेल नाही तर जाता येणार नाही.
एकंदरीत सर्वांचा राग रंग पाहुन गुपचुप पावती फ़ाडली.प्रश्न पैश्यांचा नव्हता पण याला फ़ुकट पैसे का द्यायचे हा होता.असो गरजवंताला अक्कल नसते.

नदी पात्रात अन परीसरात घाणीच साम्राज्य होत.प्रचंड प्रदुषण होत.अश्या पाण्यात आंघोळ करावी लागणार होती.बिलकुल चिडचिड न करता त्यातल्या त्यात बर्‍यापैकी स्वच्छ असणारी जागा शोधुन आंघोळ उरकुन घेतली.त्यानंतर लगेच गोंधळी तयारच होता ठरलेली पुजा, नैवेद्य इ. सोपस्कार उरकुन घेतले.आता वेळ आली दक्षिणा द्यायची.मी आपले रु.१०१ काढुन ठेवले (मला तर ते ही जास्त वाटत होते) पण रु.५०१ च्या कमी घ्यायला काही तयार होइना.त्याच गिर्‍हाइक वाढत होत त्यामुळ त्याला घाइ होती. "अहो भाउ लग्न एकदाच होत. ५०० नी तुम्हाला काय फ़रक पडणार आहे.खंडोबाच्या नावानं द्या की"..अस म्हणत त्यान मोर्चा बायकोकडे वळवला "अवो वहिनी तुम्ही सांगा की ऐकतील तुमच"....च्यामारी लय वांड दिसतय..(मनातल्या मनात)...चल घे बाबा ५०१ तर ५०१...अस म्हणुन ५०० ची नोट त्याच्या हातावर टेकवली...(घे लग्न करायची खुप हौस होती ना..अस उगीच कोणी तरी म्हणल्याचा मला भास झाला)

आता आम्ही कडेपठारच्या दिशेने निघालो.पायथ्याशी पोहचल्यावर कडेपठार पाहुनच खुप दमछाक होणार याचा अंदाज आला होता.आम्ही सर्व जण मस्त मजा करत हळु हळु गड चढायला सुरुवात केली उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात पण त्याची तीव्रता भासत होती.नवीन लग्नाची जोडी म्हणुन आजु बाजुची जनता आमच्याकडे नवलाइने पाहत होती.मजल दरमजल करत आम्ही अखेर गडावर पोहचलो.गडाचा परीसर,मंद थंडगार वारा याने सगळा थकवा आपोआप गळुन गेला.थोडा वेळ आराम करुन मग आम्ही पुजेसाठी मंदीरात निघालो.मंदीर खुप सुंदर आहे.दीपमाळ, जुनं दगडी बांधकाम तर निव्वळ अप्रतिम आहे.

आम्ही जोडीने आत मध्ये प्रवेश करताच एखाद्या शिकार्‍याला सावज सापडल्यानंतर जसा आनंद होतो तसा काहीसा भाव मला तिथल्या पुजार्‍यांच्या चेहर्‍यावर वाटला.इथे पण आपल्याला कापणार आहेत याची मला नकळत जाणीव झाली.नवपरीणीत जोडप्यांसाठी असणारी पुजा अगदी सराइतपणे त्याने उरकुन घेतली.पुजा काय केली हे मात्र काही समजल नाही.तो काही तरी मंत्र पुटपुटत होता...काय ते त्यालाच त्याच माहित.(मी मंदीराच अंतर्गत बांधकाम न्याहळ्याणतच गुंग होतो अधे मधे तो काही तरी मंत्र बोलायला लावायचा तेवढे फ़क्त म्हणायचो) अखेरीस पुजेचे सोपस्कार पार पडले नेहमीप्रमाणे दक्षिणा देण्याची वेळ आली.मी पैसे देण्याअगोदरच त्याने रु.१००० ची मागणी केली. मी ऐकुनच हादरलो ...याने १००० रुपये देण्याइतपत अशी पुजा केली तरी काय? नेहमीप्रमाणेच मी आपला वाद विवादाला सुरुवात केली.शेवटी कसा बसा तो ५००वर तयार झाला.(च्यायला ४ वर्ष इंजिनिअरिंग करण्या पेक्षा पुजारी झालो असतो तर बर झाल असत.)

आता कडेपठार वरुनच जेजुरी गडावर जायच होत.अंतर खुप होत.जेजुरी गडावर जाइपर्यंत खुप दमछाक होणार होती.त्यात भाची कडेवर होती त्यामुळे हळु हळु चालाव लागत होत.शेवटी एकदाच जेजुरी गडावर पोहचलो.लग्न सराइ असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती.रांगेत उभ राहिलो तर दर्शनासाठी ३ ते ४तास लागणार होते.त्यामुळे दर्शन पासाची काही सोय आहे का हे पाहयला गेलो.अवघ्या प्रत्येकी ५० रुपयात फ़क्त तीन मिनीटात दर्शन अस ट्रस्टच्या वतीने लावलेल्या बुथवर एकजण बोंब ठोकत होता.पटकन दर्शन होइल या अपेक्षेने मी आम्हा सर्वांचे पास काढले अन मंदीरात आत मध्ये गेलो तिथे पाहिल तर   
पास असणार्‍यांसाठी वेगळी अशी रांग नव्हती.दर्शन रांग अन पास असणारे यांची सामाइकच रांग होती.तिथे असणार्‍या पुजार्‍याला या संदर्भात विचारल तर तो म्हणाला पास हा देवस्थान ट्रस्टचा आहे त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही तुम्हाला तक्रार करायची असेल तर ट्रस्टच्या कार्यालयात जा.शेवटी तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रचंड रेटा रेटीतुन आमचा नंबर आला.नवपरिणीत जोड्यांसाठी तिथे असणार्‍या पुजार्‍याने आम्हा दोघांना बाजुला घेउन कसली तरी पुजा केली, नाव घ्यायला लावली अन १०००रुपये दक्षिणा घेतली.तिथे वाद घालण्याची काही संधीच नव्हती कारण येणार्‍या प्रत्येक नव्या जोडप्याकडुन ते अश्याच रितीने पैसे घेत होते.ती पुजा आटोपुन निघतोय तोच अजुन एका पुजार्‍याने पकडले अभिषेक करावा लागतो म्हणुन त्याने ५००रुपये (इथे पण त्याने अभिषेकाचे रेट सांगितले होते...५०० हा सर्वात कमी रेट.) घेतले.ह्या लोकांची पद्धत अशी काही आहे की ते नवख्या लोकांना बचावाची काही संधीच देत नाही.

आतील दर्शन पुर्ण करुन बाहेर जात होतो तर तिथेच अजुन एक पुजारी भेटला, अहो बाशिंग उतरवल्याशिवाय जाता कुठे इकडे या असा जोरदार आवाज दिला.सुरुवातीला काय बोलतोय काही समजलच नाही.हा नक्की काय म्हणतोय हे पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेलो.
पुजारी:लग्नात काय बांधल होत? मुंडावळी की बाशिंग
मी: बाशिंग
पुजारी: मग तुम्हाला बाशिंग उतरावयला लागेल.
मी: ते गृहप्रवेश झाल्यावरच उतरवलय
पुजारी: नाही तस नाही उतरवत ते इथच उतराव लागत.
मी: नाही उतरवल तर.
पुजारी: सांगितल ना कुलाचाराप्रमाणे ते इथे उतरावच लागत.

कुलाचार म्हणाल्यावर काय बोलणार??? उतरवल इथ बाशिंग (म्हणजे काही तरी पुजा केली...न समजणारे मंत्र म्हणाला) ....पुन्हा ५०० ला चंदन....मनातल्या मनात खुप चरफ़डत होतो पण करणार काय??? हे सार संपवुन झाल बाहेर आलो ...आता तरी सुटलो अस वाटत होत तोच तळी भरायची बाकी आहे..ती भरुन घेउ या...तीर्थरुपांनी आदेश दिला.त्यामुळे तळी भरायल गेलो.तिथे पण सगळीकडे भेटले तशेच तळी भरणारे तयारच होते. तळी भरली...(यांचे आत्ताच दोनाचे चार हात झालेत लवकरच सहा हात होऊ दे...असा आगाउपणा त्याने केला.)तळी,शिदा देणे अस मिळुन याने पण पाचशे घेतले.

अवघ्या काही मिनीटात मी ३५०० हजाराला कापलो गेलो होतो.खर तर या सगळ्या गोष्टींचा संताप येत होता.देवाच्या नावाखाली ढळढळीत लुट चालु होती पण यांना अडवणार कोणीच नव्हत.हाच आमचा खरा धर्म आहे का??एवढे पैसे घेउन पण गडावर सगळा आनंदी आनंद होता.चहु बाजुला प्रदुषण,सुविधांचा अभाव, भिकार्‍यांचा सुळसुळाट.सगळा भोंगळ कारभार आहे.दुर्दैवाने याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेल आहे.


या सगळ्यात मला देव कुठ भेटलाच नाही.मंदीरात गेल्यानंतर मनाला जे समाधान लाभत ते मात्र इथ आल्यावर मी हरवुन बसलो होतो.अस्वस्थ मनानेच जेजुरी सोडल तेव्हा दुरवर डोंगरावर गडापासुन दुर  माणसापुढे हतबल झालेला खंडोबा आपल्या परीवारासह आराम करत असल्याचा भास झाला.

सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा  देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत.