मी येतोय...


बाप्पा : मुषकराव चला तयारी झाली का पुर्ण....उद्या आपल्याला निघायच आहे....उद्यापासुन दहा दिवस पृथ्वीतलावर आपला मुक्काम असणार आहे.

मुषकराव : बाप्पा, तयारी तर झाली आहे....पण ह्या वर्षी मनात जरा धाकधुक आहे.

बाप्पा: का रे बाबा....काय झाल तुला? आता कसली धाकधुक वाटते आहे?

मुषकराव: बाप्पा, क्षमा असावी पण तुमच्या नकळत मी मागील आठवड्यात पृथ्वीची चक्कर मारुन आलोय. ह्या वर्षी तुमच्या स्वागताची तयारी कशी केली आहे हे पाहण्यासाठी गेलो होतो.

बाप्पा : (स्मित हास्य करत...) अरे मुषकराव तुम्ही तर फ़ार हुषार निघालात द्या बर वृतांत...जरा मला पण कळु द्या ....यावर्षी तयारी कशी झाली आहे ते.

मुषकराव: बाप्पा....काय सांगु अन कस सांगु....सुरुवात कशी करावी तेच समजत नाही. अहो महागाई,भ्रष्टाचार,गुन्हेगारी यात सर्व जनता होरपळते आहे.रोज एक नवीन घोटाळा अन महिन्यागणिक होणारी भाववाढ. राजा तुपाशी अन जनता उपाशी अशीच काहीशी परिस्थिती आहे. सामान्य चाकरमान्याला घरखर्चाची जुळणी करता करता नाकीनऊ आलयं. हे सार काही कमी होतं ,त्यात वरुणदेव यावर्षी नाराज झाले त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. आत्ता बाप्पा....सांगा...ह्या अश्या परिस्थिती मध्ये कोण तुमचं दणक्यात स्वागत करेल?

बाप्पा: मुषकराव......तुम्हाला काय वाटतय मला ह्या परिस्थिती मला माहित नाही का? मी हे सर्व जाणुन आहे. पण तुला माहित आहे का?? हे सारं असुन ही माझा भक्तगण  माझ स्वागत नेहमीप्रमाणेच तितक्या धुमधडक्यात करणार. सिलेंडरच्या किंमती वाढु दे किंवा डिझेल वाढु दे....माझ्या सेवेत ते कोणतीच कमी पडु देणार नाही हा मला विश्वास आहे अन मी पण त्यांच्या वर कृपादृष्टी मध्ये कोणतीच कसर ठेवणार नाही हा त्यांचा विश्वास आहे. हा आमचा एकमेकांवरील विश्वासचं आमच नातं दृढ करतो आहे. अरे फ़क्त "बाप्पा येतोय...." म्हणलं की सर्व कशे उत्साहात येतात बघ. हे दहा दिवस म्हणजे माझा उत्सव नसुन त्यांच्या जगण्याचा उत्सव आहे. संपुर्ण वर्षभरासाठीचा असणारा सुख, समृद्धी अन आनंदाचा ठेवा आहे. या दहा दिवसात माझ्या सेवेत काही पण कमी पडु नये म्हणुन प्रत्येक जण हा अहोरात्र झटत असतो. सर्व भक्तगण आप आपल्या चिंता ,दुःख सार काही विसरुन फ़क्त माझ्या सेवेत मग्न असतो. अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्टी....यासर्वांसोबत लढण्याची शक्तीच त्यांना या श्रद्धेतुन मिळते. अखेर लढाई तर त्यांनाच लढायची आहे पण यासर्वात त्यांच्या पाठीशी फ़क्त माझ असणं हीच त्यांची ताकद आहे.

मुषकराव: बाप्पा....माझ्या मनात आता कोणताही किंतु नाही...तुमच्या या बोलण्यातुनच माझ्या सर्व शंका निरसन झालं. चला आता थोडी विश्रांती घेउ या उद्या सकाळी लवकर पोहचायच आहे, आपल्याला उशीर व्हायला नको.

                                     ॥गणपती बाप्पा मोरया॥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हो...हो...बस्स एकच दिवस....येतोय...तुमचा आमचा सर्वांचा बाप्पा येतोय........सुख, समृद्धी,चैतन्य, आनंद सारं काही घेउन येतोय..... स्वागताला तयार आहात ना तुम्ही ???

2 comments:

हेरंब said...

>> अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्टी....यासर्वांसोबत लढण्याची शक्तीच त्यांना या श्रद्धेतुन मिळते. अखेर लढाई तर त्यांनाच लढायची आहे पण यासर्वात त्यांच्या पाठीशी फ़क्त माझ असणं हीच त्यांची ताकद आहे.

अगदी अगदी खरंय.. गणपती बाप्पा मोरया !!

श्रिया (मोनिका रेगे) said...

गणपती बाप्पा मोरया!