नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . . .









सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद अन् नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू या!!!

सर्व वाचकांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. . .आपली सर्व स्वप्न, आशा , आकांशा पूर्ण होवोत ही स्वामी चरणी प्रार्थना!!!!

वरील शुभेच्छा पत्र "भुंगाच्या" ब्लॉगावरून घेतल आहे. भुंगाचे हार्दिक आभार!!!

विकेट पडली!!!!!

2009 मधील सर्वात अविस्मरणीय घटना म्हणजे माझी विकेट पडली. नाही समजलात अहो जिच्या शोधात जे काही भन्नाट कांदे पोहे पचवले ती अखेरीस सापडली.दिवाळी पाडव्याच्या दिवशीच आमची विकेट पडली अन् ती ही अगदी नाट्यमयरीत्या. तशी ही पोस्ट मी त्या दरम्यानच करणार होतो पण म्हणल एवढी महत्वाची ही घटना वर्षाअखेरीस ब्लॉगवर टाकु या. (महेन्द्र काका कस वाटल ब्लॉग न लिहीण्याच कारण ?? :) )

दिवाळी ला समस्त कामगार वर्ग सुट्टी ला गेल्यामुळे स्लॅबवर पाणी मारण्याच काम माझ्याकडे आल होत. दिवाळी पाडाव्याच्यादिवशी अभ्यंग स्नान झाल्यावर नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी मी साईटवर पोहचलो, तोच ताई चा फोन आला " तू तिथेच थांब तुला घ्यायला माई (माझी मोठी बहीण)व जीजु येत आहेत अन् त्याच्यासोबत तुला मुलगी पाहायला जायचाय."मी काही प्रतिक्रिया देइपर्यंत पुढील वाक्य अस बाबानी सांगितलय. बस तीर्थरुपांचा आदेश म्हणल्यावर काय बोलणार आम्ही??? बाबा कुठे आहेत विचारल तर ते पुढे गेलेत तुम्हाला ते तिथेच भेटतील. . .आता मात्र जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

स्लॅबवर पाणी मारायला आलो असलो तरी पण योगा योगाने जरा ठीक ड्रेस होता त्यामुळे अवतार जरा बरा होता.थोड्याच वेळात जीजू आले अन् आम्ही निघालो. साइटपासुन साधारण 15 की.मी. वर तीच गाव होत. आम्ही तिथे जाण्यागोदर रस्त्यात बाबा अन् काका ( ज्यानी हे स्थळ सुचवल ते ) हे भेटले, त्यांच्याकडुन समजल की अजुन अर्धा तास थांबाव लागेल कारण तिथे अगोदरच दुसरे पाहुणे पाहण्यासाठी आलेले होते. थोड्या मिस कम्युनिकेशन मुळे हा गोंधळ झाला होता.त्यांना पण खूप चुकीच वाटत होत पण ते तरी करणार काय?? ते पाहुणे गेले की सांगा मग आम्ही येतो अस सांगुन आम्ही आमच्या परीचयाचे एक स्नेही तिथे जवळच राहतात तिकडे गेलो.

बाबा थोडे बाजूला जाताच ,आमचा मराठी बाणा जागा झाला. माई जवळ थोडासा राग म्हणजे निषेध व्यक्त केला (कसा केला असेल ते समजून घ्या). मी जातो, तुम्ही बघून घ्या, माझा मूड गेलाय, मी नकारच देणार ई.ई. . . .अस माझ चालू होत तोच आमचे तीर्थरुप आले फक्त त्यांनी माझ्याकडे पाहील अन् विचारल काय झाल काही अडचण आहे का?? थोडा समजूतदारपणा दाखव. . .बस्स संपल पुन्हा एकदा बोलती बंद, ढान्या वाघाच मांजर झाल होत!!!

तब्बल पाउन तासाने त्यांचा फोन आला मग आम्ही निघालो. तो पर्यंत ब्लॉगवर यावर काय खरडायच याचाच विचार करत होतो.ह्या मुलीला नकार द्यायचा असा दृढ निश्चय करून निघालो. फक्त केलाच नाही तर तो माई अन् जीजू जवळ बोलून पण दाखवला.

शेवटी आम्ही त्यांच्या घरी पोहचलो माझा मूड नसल्यामुळे मी अगदी शांत होतो. सुरुवातीला कश्यामुळे गोंधळ झाला, तसदीबद्दल क्षमस्व,आमची ओळख परेड इ. झाल. त्यानंतर मग मुलीला बोलवल. . .आलोच आहे तर बघू या. . . .अश्या प्रामाणिक हेतूने एक चोरटा कटाक्ष टाकला. . बस्स काय झाल माहीत नाही लेकीन आपून के दिल की घंटी बजी!!!
मनातून अस वाटल यार हीच ती!! जिला आपण शोधतोय ती हीच. . .(आता झाली का गोची!!! :)) आयुष्यात पहिल्यांदा अस फिलींग आल होत.

बाबा अन् जीजू यांनी थोडे प्रश्न विचारले, आता वेळ होती माझी. . .मी काय विचारू?? अगदी भोळा भाव दाखवून मी म्हणालो ( मनातून तर मला फक्त तिच्याशीच बोलायच होत) शेवटी तुम्ही दोघे बोला आम्ही सगळे बाहेर जातो अस सांगुन सर्व जण बाहेर पडले. . मनातून तर लाडू फुटत होते. . चला आता बोलता येईल अस वाटल. . . पण हा आनंद फार काळ नाही टिकला. . कारण तिचा भाउ अन् तिचे काका हे समोरच येऊन बसले अन् त्यानंतर ही आली.

आता काय बोलणार?? तिच्याशी बोलण्याअगोदरच बंधुराज सुरू झाले काय करता, डिग्री कुठे झाली. कॅड मॅनेजर आहे म्हणल्यावर मग आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या.तिच्याशी फक्त एकदाच बोललो. साधारण 15-20 मिनिटानी आमच्या गप्पा संपल्या अन् ते ही तिच्याशी काही न बोलता.

आम्ही बाहेर पडताना माझा दृढ निश्चय अगदी कोलमडून पडला होता. बाबा, माई, जीजू गालातल्या गालात हसत होते कारण आता त्यांना मी सापडलो होतो.निघाल्यानंतर थोड्यावेळाने तीर्थरुप म्हणाले तर मग काय नकार कळवुन टाकतो. तू तर तेच ठरवल होत ना?? यावर मी शांत झालो खाली मान खालून आपला गप्प बसलो. . .काही बोलाव म्हणून वर पाहील तर सगळेजण हसत होते. . . माझी विकेट पडली होती!!!

साधारण 2 दिवसांनी त्यांचा पण पसंतीचा फोन आला. त्याच वीक मध्ये मला कैरोला निघायच होत त्यामुळे माझी गडबड होती म्हणून तुम्ही बोलणी करून घ्या फक्त फायनल निर्णय होण्यापूर्वी मला मुली ला भेटायचाय, त्यानंतरच आपला निर्णय द्या अस मी बाबांना सांगुन दिल.

मला कैरो ला लगेच जायच होत त्यामुळे भेटायच कस हा प्रश्न होता कारण ती मुंबईत मी पुण्यात . . . भेटणार कस?? सुट्टी मिळणं पण अवघड. ह्या सगळ्यात शेवटी जाताना विमानतळावर भेटू या अस ठरवल.

माझी सकाळी 9.00 ची फ्लाईट होती त्यामुळे पुण्याहून मी रात्रीच निघणार होतो. पहाटे 5.30 ला भेटू या अस नक्की झाल. ठरल्याप्रमाणे मी 5.30 मी टर्मिनल 2 ला पोहचलो. पण अजुन ही लोक काही पोहचली नव्हती. एकटी येते की सारा परीवार घेऊन येते, काय बोलू, काय विचारू,वेळेवर येईल का?? खूप सारे प्रश्न मनात येत होते.

शेवटी 5.45 ला तिचा भाउ अन् ती आले अन् मी सुटकेचा निश्वास सोडला. चला आता तरी किमान मी बोलू शकेन अस वाटत होत. पण बाहेर उभ राहून कस बोलणार ?? म्हणून मी चेक इन करून तर ही दुसर्‍या गेट ने अरायव्हल ला येईल मग तिथे बोलू या अस सांगुन मी अरायवलला गेलो. तिथे जाउन पाहतो तर काय. . .तिथे मध्ये बॅरीकेड होत त्यामुळे. मी टर्मीनल 2 मधून अरायवल ला जाउ शकत नव्हतो. झाल पुन्हा एकदा पोपट!!!

ती पलीकडे अन् मी अलीकडे अश्याच आम्ही गप्पा मारल्या. अन् त्या बॅरीकेडच्या साक्षीणेच मी तिला लग्नासाठी विचारल.
आमच्या दोघांचा पण निर्णय झाला. तेवढ्यात तिचा भाउ सॅण्डविच घेऊन आला ते खाउन आम्ही निरोप घेतला.लगेच बाबांना फोन करून निर्णय देऊन टाकला. अन् त्यांनतर 2 आठवाड्याने आमच लग्न नक्की झाल.

त्या दिवशी निघताना मी संदीप खरेचं " हे भलते अवघड असते. . . . " हे गान मी फील करत होतो. मुंबई विमानतळावरील तो अरायवल सेक्शन आम्ही दोघेपण कधीच विसरू शकणार नाही.

हे कशे योगा योग असतात ना??? पाहा. . . मी नकार द्यायचा अस ठरवून गेलो होतो त्या मुलीलाच होकार दिला.अन् सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, "मी मुंबईच्या मुलीशी कोणत्याही परीस्थीतीत लग्न करणार नाही अस ठरवल होत पण शेवटी मला मुंबईचीच मुलगी मिळाली." (समस्त मुंबईकर मुलींची माफी मागून. . .होणारी बायकोसुद्धा आली त्यात!!)

चला अजुन 5 महिने तरी बॅचलर लाइफ जगून घेतो.!!!

पोरका...

सध्या कैरोमध्ये पुन्हा मी हॉस्टेल लाइफ अनुभवतोय.सध्या कामाचा ताण तसा कमीच आहे. त्यामुळे फिरणं भरपूर चालू आहे.हॉस्टेलला जसा ग्रूप करून मस्ती करायचो तेच सध्या आम्ही करतोय.आज जी पोस्ट करतोय ती आमच्या मस्तीवर किंवा फिरण्यावर नाही तर थोडी वेगळी आहे.

खुपदा अस होत की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून आपण त्याचा स्वभाव ठरवून टाकतो.म्हणजे बघा एखाद्याने पैसे खर्च करताना खूप विचार केला तर वाटत यार हा पक्का कंजुस आहे, कधी कोणी जास्त स्पष्ट बोलल तर तो फटकळ. अस खूप सार वर्गीकरण केलेल असत आपण.पण आपण कधी हा विचार करत नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव असा का झाला असेल?? अशी कोणती परिस्थिती याने अनुभवली असेल की ज्यामुळे याचा स्वभाव असा झाला.माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.

आमच्या कंपनीत असाच एक आर्किटेक्ट मित्र आहे की जो कोणतीही गोष्ट करताना अगोदर पैश्याचा विचार करतो. मग तुम्ही ते भाजी खरेदी जा किंवा कोठे फिरायला जायचा प्लान करा.याला विचारायच म्हणजे याचा नेहमीचा प्रश्न किती पैसे लागतील??अन् मग त्यावरून त्याचा निर्णय होनार. कधी कधी हे आम्हाला सगळ्याना खूप त्रासदायक वाटत. त्यामुळे कसलाही प्लान असला की त्याला कोण विचारणार अन् मग त्याला त्यासाठी तयार कोण करणार हा सगळ्यात गहन प्रश्न!! कारण ग्रूप मध्ये एकट्याला सोडून जाणं. पण बुद्धीला पटत नाही. तसा त्याला पगारपाणी पण चागला.राहणीमान पण टापटीप.अस सार असताना हा असा का वागतो याच कोड आम्हाला सगळ्याना असायच.

काल रात्री कार्यालायातच आमचा गप्पाचा फड जमला होता. आमच्या ह्या मित्राचा प्रेम विवाह त्यामुळे आम्ही त्याला त्याची प्रेम कहाणी विचारली.कुठे भेटलास, कोणी प्रपोज केल ई. नेहमीचे साचेबद्ध प्रश्न. हे सांगताना त्याने त्याच्या आयुष्याची कहाणीच आमच्या पुढे ठेवली.अन् ते ऐकून आम्ही सारे स्तब्ध झालो.

माझा हा मित्र अन् त्याचा भाउ हा एवढाच याचा परीवार. याची आई लहानपणीच वारली. अन् हा 12वीला असताना याचे वडील वारले. अश्या या अनाथ भावाडांना त्याच्या दूरच्या मामाने आसरा दिला. दोघांमध्ये हा थोरला असल्याने आता लहान भाउ, स्वतःच शिक्षण, भावाच शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी याच्यावर आली.

याने पार्ट टाइम जॉब करत बी.आर्क पूर्ण केल तर भावाला कॉम्प्यूटर इंजिनीअर केल. हे सार करताना परीस्थीतीने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची परीक्षा घेतली. ह्या जगात आई बापाच छ्त्र हरवाल्यानंतर जगणं किती कठीण असत हेच त्याने अनुभवल.
त्याच्या महाविद्यालयीन मैत्रीणी बरोबरच याने लग्न केल. हा महाराष्ट्रीयन तर ती उत्तर प्रदेशची.त्यावेळी लग्न करायाच म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न होता बोलणी करणार कोण?? हा तर सगळ्यात मोठा अन् भाउ तर तेव्हा शिकत होता.जवळच अस कोणीच नाही.
शेवटी मनाच धाडस करून हा अन् याचा लहान भाउ अशे दोघेच जण लखनौला तिच्या घरी गेले. तोपर्यात तिने सुद्धा घरी या सगळ्याची पूर्व कल्पना दिली होती. नशीबाने , याला पाहिल्यानंतर तिच्या घरून काहीच विरोध झाला नाही. यानंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्यासाठी मोठ कोणी तरी असाव म्हणून तो याच्या दूरच्या त्या मामाला घेऊन आला अन् मग याच लग्न झाल.
नुकताच त्याने अन् त्याच्या भावाने मिळून पुण्यात फ्लॅट घेतलाय. 3-4 महिन्यापुर्वीच त्याला मुलगा झालाय.त्याच घर चालत ते फक्त पगारावर.

हे सार ऐकल्यावर मला तरी वाटल की अरे यार जर एवढ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस असेल तर तो जे काही वागतो ते माझ्या मते तरी योग्यच आहे. प्रत्येक वेळी जर खर्च करताना तो पैश्याचा विचार करत असेल तर त्यात गैर अस काहीच नाही.कारण शेवटी त्याला शून्यातून विश्व निर्माण करायाच आहे अन् ते ही कोणाच्याही आधाराशिवाय!!!

आज ही जेव्हा जेव्हा मला खूप बोअर होत किवा खूप टेन्शन येत तेव्हा मी माझ्या बाबांशी बोलतो.त्यांच्याशी बोलल की खूप बर वाटत. आई बाबा आहेत ही भावना जे सुख देते, ते सुख तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही.

मी स्वतः माझ्या आई बाबं शिवाय?? . . .याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्याकडे काही नसल तरी चालेल पण आई वडीलाच छत्र हे आपल्या डोक्यावर असायलाच हव!!!

पांगिरा- विश्वास पाटील



कालच विश्वास पाटील यांची "पांगिरा" कांदबरी वाचून झाली. पांगिरा अन् डोंगरवाडी या दोन गावांची ही कहाणी.
यात पांगिरा गाव हे नायक अन् त्याभोवतीच सारी कांदबरी फिरते.

पांगिरा दुसर तिसर काही नसून ही काळ्या मातीची कर्मकथा आहे.निसर्गाच वरदान लाभलेल पांगिरा हे गाव.
मुबलक पाणी, कसदार काळीभोर जमीन. सगळी बागायती.फक्त उसाची भक्कम शेती करणार हे गाव. उसाच्या शेती बरोबरच गावाची श्रीमंती वाढली, माडीची घर, गाड्या,ट्रक्टर, हॉटेल हे सार काही आल. तालुक्यात गावाची पत वाढली.आतापांगिरा हे महत्वाच सत्ता केंद्र झाल.

गावाने कात टाकायला सुरूवात केली. नवनवीन याओजणा अं सुख सुविधा गावात यायला लागल्या. गावात वीज आली तास उसाची शेती वाढली, अमाप पाणी उपसा होऊ लागला.नंतर दूध डेअरी आली.

आता हा गावगाडा चालवायचा म्हणजे गावाचा कारभारी आलाच अन् जिथे सत्ताधारी आले तिथे विरोधक आलेच.
मग सुरू होतो सत्तेचा खेळ. राजकारणाच्या पटलावर आपल वर्चस्व सिद्ध करण्याचा एक खेळ. मग त्यात वाटेल ते करण्याची तयारी.

या गावातील प्रत्येकाला एक धुंधी आहे अन् त्यातच ते सारे जण जगत आहेत. "सार्‍या जगाला दुष्काळ पण पांगिरा सुकाळ" असा यांचा भ्रम. याटक पाण्याचा अमाप उपसा, वृक्षतोड, हे सार काही चालू आहे. सिदुबा अन् यमाई या दोन देवांच्या श्रद्धेवर हा गाव चालतो.त्याला कोंबड कापल की सगळे गुन्हे माफ. या अश्या वागण्यातच त्यांचा उद्याचा विनाश आहे अस कोणी सांगितल तर त्याला हे वेड ठरवणार.

तर असा हा गाव आता पुढे काय होत हे वाचण्यात मजा आहे.विश्वास पाटील यांनी सध्याच वास्तव लिहल आहे. पारंपारीक खेड अन् आधुनिक सुधारणावादी खेड यातील स्थित्यंतर अचूक लिहल आहे.

नव्या व्यवस्थेते जिल्हा परीषद, पंचायत समीती आल्या.बलुतेदारी गेली, जाती व्यवस्था निकालात निघाली, कूळ कायदे गेले. पंचाच्या साक्षीने चालणारा गाव गाडा ढासळला. पाटील,कुलकर्णी गेले अन् तलाठी, ग्रामसेवक अशे नवे बलुते आले. आमदारकी, जिल्हा परीषद, ग्राम पंचायत अश्या प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा पट खेळला जाउ लागला. अन् त्यातून सुरू झाला एक आपल्याच विनाशाचा खेळ.

हे सार या पुस्तकात आहे. एका सर्व संपन्न गावाकडून दुष्काळी गाव अश्या या स्थित्यंतराच वर्णन यात आहे. विश्वास पाटील यांनी उभा केलेला "पांगिरा" हा सामाजिक भान हरवलेल्या सध्याच्या खेड्याच प्रतिनिधीत्व करतो.

या कादंबरीतील मुरार पाटील ही व्यक्तीरेखा मला खूप भावली. करारी पण तितकाच हळवा. जिद्दीवर आपल्या मुलाला वकील करणारा.परंपरेबरोबरच आधुनिकतेची कास धरणारा. मुरार पाटील अन् त्याची बायको राधाई ह्या दोघांमधील प्रसंग खूप भाव स्पर्शी आहेत.विश्वास पाटील यांच्या लेखणी ने अत्यंत ताकतीने ते आपल्यासमोर उभे केले आहेत.

एकदा तरी जरूर वाचावी अशी ही कांदबरी आहे.

उद्ध्वस्त खेडी, वैराण राणे
पाण्याचा गैर वापर, दुष्काळाचे गाणे
टपोर्या कणसारखी मातीतली माणसे
आधुनिकीकरण, सहकार अन् लोकशाहीचा फेरा
गावाच्या काळ्या - पांगिरा एका तपाचे तीन तेरा
हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा!!!

खरी कमाई!!!

2 दिवसांपुर्वी भानस यांच्या ब्लॉगवर "खरी कमाई" ही पोस्ट वाचली अन् त्यावरून ही पोस्ट लिहतोय.

गेले 2 महिने मी प्रोजेक्टसाठी कैरोला आहे, ताई पुण्यात अं आई बाबा दोघे पण गावी आहेत.
बाबांना गुरुवारी संध्याकाळी अचानक चक्कर आली, त्यामुळे आई ने लगेच घराशेजारील दवाखान्यात नेल. चेक अप केल्यानंतर लक्षात आल की त्यांचा बी.पी लो आहे व हृदयाचे ठोके पण कमी झालेत अन् त्यात त्यांना हृदयविकाराचा त्रास त्यामुळे त्वरीत मोठ्या हॉस्पीटल ला नेणं गरजेच होत. कारण हृदयविकाराचा झटका येण्याची पण शक्यता होती. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर ताई त्यांना चेक अप ला पुण्यात घेऊन आली.

शनीवारी पुण्यातील डॉ. हिरेमठ यांच्याकडे चेक अप केल्यावर त्यांनी त्वरीत ऐंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला.
यासाठी साधारण 2 .25 लाख खर्च होणार होता अन् थोडी रक्कम अगोदर भरावी लागणार होती. त्या क्षणी ताइने मला फोन करून कळवलं. आता माझ्यापुढे प्रश्न होता तो फक्त पैश्यांचा. शनिवार असल्यामुळे मला ट्रान्सफर पण करता येणार नव्हते.

मी विचारात होतो अन् मनात नकळत स्वांमी समर्थांचा जप करत होतो, तेवढ्यात सच्याचा मेसेज आला. (सच्या माझा एकदम जिवलग मित्रा आम्ही इंजिनिअरिंगचे पासूनचे मित्र.) " तू काळजी करू नकोस मी आहे."त्याच्या फक्त एका मेसेजाने मला खूप रिलीफ मिळाला.
त्यानंतर त्याने अवघ्या तासात 1,60,000 जमा केले. आमच्या सगळ्या ग्रुपने अगदी क्षणाचाही विचार न करता आप आपली खाती रिकामी केली.त्यात रोहिणी म्हणून माझ्या मैत्रीणीची मैत्रीण तिने पण मदत केली,की जिला फक्त 1 ते 2 वेळा भेटलो असेल.

या नंतरच्या भावना व्यक्त करण्यासाठी खर तर माझ्याकडे शब्दच नाहे आहेत. खर सांगायच तर या भावना शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही.

पण फक्त एवढच नाही तर प्लास्टी होऊन डिस्चार्ज होइपर्यंत सगळेजण आई अन् ताई सोबत थांबले होते. या दरम्यान आई किंवा ताई यांना कधीच मी त्यांच्यासोबत नाही अस वाटल नाही इतका सारा आधार या सर्वांनी दिला.

मी यासाठी माझ्या मित्रांना धन्यवाद म्हणणार नाही किंवा हे उपकार आहेत अस पण म्हणणार नाही. मी म्हणेन ही फक्त मैत्री आहे अन् ही मैत्री आयुष्यभर अशीच असावी.

अन् सगळ्यात महत्वाच म्हणजे डॉ. हिरेमठ, बाबांचे ब्लॉकेज जास्त होते म्हणून ताई ला वाटत होत की आता बहुतेक बायपास करावी लागेल पण त्यांनी ऐंजिओप्लास्टी करा असा सल्ला दिला.
जेव्हा त्यांना समजल की भारताबाहेर आहे अन् ताई व आई शिवाय घरातील दुसर कोणी नाही तेव्हा त्यांनी आपुलकीने पैसे कसे जमा करणार, काही अडचण आहे का?? चौकशी केली.त्या क्षणी त्यांनी डॉक्टर म्हणून दिलेला आधार ताई व आई ला मानसिक बळ देऊन गेला

मला वाटत मी कधीही न पाहिलेले डॉ. हिरेमठ , 1-2 वेळाच भेटलेली रोहिणी किंवा आमच्या ग्रुपची मैत्री हीच खरी कमाई आहे!!!