विचार"जंत"...


दिसागणिक सारं काही बदलत चाललयं.मानवजातीने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर दिवास्वप्न वाटणार्‍या संकल्पना सत्यात साकार केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ जग मुठीत सामावुन टाकल. जगाच्या दोन विरुद्ध टोकाला असणार्‍या समुदयांमध्ये विचारांची देवाण घेवाण सुरु झाली.प्रत्येकाला आप आपलं मत मांडण्यासाठी "सोशल नेटवर्कींग" च्या रुपाने माध्यम मिळालं अन यातुनच एक नवा जंत जन्माला आलाय .... तो म्हणजे "विचारजंत".

कुठेही जा हा तुम्हालाच भेटणारच.जळी, स्थळी, काष्ठी सर्वदुर याचा वावर आहे.विशेषतः फ़ेसबुक, टिव्टर यावर यांचा सर्वात जास्त वावर. इथे गेलात की हमखास भेटणारच. त्यानंतरच दुसर ठिकाणं म्हणजे चॅनेल - पॅनेल. कोणतही वृत्त्वाहिनी सुरु करा...चार पाच विचारजंतवादी एकत्र येउन टाळ कुटत बसलेलेच असतात.
मला ह्या विचारजंताच एका गोष्टीच फ़ार नवल वाटत...ते म्हणजे...विषय कोणताही असो त्यावर यांची एक्सपर्ट प्रतिक्रिया असणारच. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सामाजिक इ.इ. विषय कोणताही असो हे विचारजंतवादी सभा ठोकणार म्हणजे ठोकणारच. एक मराठी वाहिनीवर प्राईम टाईम मध्ये अशेच एक विचारजंती रोज म्हणल तरी चालेल असतातच. कोणताही प्रश्न असो एक्सपर्ट म्हणुन हे हजर असतातच. ह्या माणसाला दुसर काही काम आहे की नाही हाच मला प्रश्न आहे.

वृत्तवाहिनीवर तरी ते वाहिनीवाले ज्यांना बोलवतील त्यांनाच झेलायला लागतय. पण फ़ेसबुक अन टिव्टर वर या लोकांसाठी तर मोकळा मंगळवारच. आओ जाओ घर तुम्हारा. थोड कुठं खट्ट झाल की भिंती रंगावयला तयार. खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणल्यावर कोणी काहीही लिहु शकतो अथवा वागु शकतो पण त्याला थोड तरी तारतम्य असाव. प्रसंगानुरुप आपण काय बोललं पाहिजे किंवा एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देताना थोड तरी तारतम्य बाळगल पाहिजे.

बाळासाहेबांचा मृत्यु, आझाद मैदानावरील घटना, सचिन तेंडुलकरची निवृत्ती, दिल्ली बलात्कार प्रकरण अश्या खुप सार्‍या घटनांमध्ये ह्या विचारजंतानी जे अकलेचे तारे तोडले होते ते पाहुन संताप आला होता.अन यांच्या सोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. त म्हणतात डुक्कराबरोबर कुस्ती करण्यात काहीच मजा नाही...कारण ते डुक्करच त्याला चिखलातच लोळायला आवडत.

खर सांगायच तर कधी कधी या सर्व गोष्टींचा नकळत स्वतःवर ही परीणाम होतो.खुपदा मनस्ताप पण होतो. कधी कधी या लोकांचं बौद्धिक इतक्या खालच्या पात्रतेला जातं की त्यावर कसं रिअ‍ॅक्ट व्हाव हेच कळत नाही.
शेवटी विचार पक्का केला अन स्वतःच सोशल लाईफ़ लिमिटेड करुन घेतल. टिव्टरवर फ़क्त ठराविकच लोकांना फ़ॉलो केल बाकी सर्वांना अनफ़ॉलो केलं. फ़ेसबुकवर पण ठराविक मित्रांचेच अपडेट्स ला सबस्क्राईब केलं.एका ठराविक वेळेलाच फ़क्त सोशल साईटस वर जातो. अन सर्वात महत्वाच म्हणजे न्युज चॅनेल अन न्युज पेपर दोघांनाही राम-राम ठोकलाय. तसही आजकाल बातम्या पाहुन किंवा वाचुन ज्ञानात काही भर पडेल अस वाटत नाही.

मी तरी ह्या "विचारजंतांपासुन" मुक्ती मिळवली आहे....मस्त वेळ मिळतो आहे...चांगली पुस्तक वाचतो आहे. डोक्याला शॉट नाही.