उद्याचे "अराजक"....

काही महिन्यांपुर्वीच बहिणीने एक शाळेत शिक्षक म्हणुन जॉईन केलं. सध्या ती ५ ते ७ वी ला सध्या शिकवते. तिने सांगितलेले हे दोन अनुभव .सध्या त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमा अंतर्गत मागील आठवड्यात ६वी च्या मुलांसाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली की ज्या मध्ये त्यांना एक काल्पनिक कथा लिहायची होती. त्यासाठी कोणताही विषय असा देण्यात आला नव्हता विद्यार्थ्याने त्याला आवडेल त्या विषयावर लिहायच होत.त्याचा निकाल असा होता.

नकारात्मक कथा - ९०%
सकारात्मक कथा - १०%

नकारात्मक कथा म्हणजे हिंसक तर सकारात्मक म्हणजे सामाजिक संदेश देणारी किंवा प्रेरणा मिळावी अशी गोष्ट.

अजुन एक अनुभव....हा मात्र ७वी च्या मुलांबाबत.मराठी च्या चाचणी मध्ये अपुर्ण म्हणी पुर्ण करण्यासाठी होता त्याची उत्तर पाहा
१. ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी.
२. घरोघरी हीच बोंब
३.उथळ पाण्याला घागर नळाला.

सुरुवातीला जेव्हा ताई ने मला सांगितल तेव्हा मला यात फ़ारस विशेष अस काही जाणवल नाही. पण नंतर लक्षात आल उद्याच्या पिढीचं मानसिकतेचं प्रतिबिंबच या गोष्टींमधुन दिसतय. उद्याच्या पिढीची मानसिकता कुठे तरी नकारात्मक अन हिंसक होते आहे का? सध्या बालगुन्हेगारीच वाढलेलं प्रमाण पाहता कुठे तरी ह्याची जाणीव होते.पुण्यामध्येच खंडणीसाठी वर्गमित्रांनी केलेला खुन, एकतर्फ़ी प्रेमातुन दहावीतल्या मुलीची केलेली हत्या.हे सारचं मन सुन्न करणार आहे.

अचानक अस झालय तरी काय त्यामुळे अस घडतय. याला मुख्यतः आपणच जबाबदार आहोत. आपलं बालपण अन आजच्या पिढीचं बालपण किती फ़रक आहे? आपल्यावर झालेले संस्कार अन आजच्या मुलांवर होणारे संस्कार. संस्कार करणारे घरामधील वडीलधारी माणसचं आजच्या चौकोनी कुटुंबातुन गायब झाली आहेत. आई-बाबा दिवसभर ऑफ़िसात अन मुलगा पाळणाघरात अशी सध्याची परिस्थिती आहे.त्यामुळे मुलांबरोबरचा संवाद बराचसा कमी झालाय.

सध्याच सामाजिक जीवनमान बिघडवणारी मुख्य गोष्ट  म्हणजे "इडीयट बॉक्स" अर्थात टी.व्ही. आज घराघरात टी.व्ही म्हणजे जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.अन टी.व्ही. वरुन सध्या असत तरी काय....त्याच त्या साचेबद्ध मालिका. सहजच तपासुन पाहा अशा किती मालिका आहेत की ज्यांच्या माध्यमातुन संस्कारक्षम अशे विचार आपल्यापर्यंत पोहचले जातात. सतत सासु,सुना,प्रेम प्रकरण नाही तर कुठला तरी रिएल्टी शो हेच सुरु असत. एक तर टी.व्ही. नाही तर मग कंप्युटर किंवा मोबाईल हेच मनोरंजनाची साधन झाली आहेत.


मैदानी खेळ,संस्कार वर्ग हे सार भारत ते इंडीया हे संक्रमण होताना नामशेष होतय की काय अशी भिती वाटायला लागली.बालपणात जर तुम्हाला बहुतांश वेळा जर अशे संस्कार मिळणार असतील तर पिढी नकारात्मकच घडणार.


सरसकट सर्वांना एका चष्म्यातुन नाही पाहता येणार ....सर्वच पिढी नकरात्मक अथवा हिंसक होते आहे अस नाही पण अशी भावना असणार्‍यांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी कमी पण नाही. गरीब, मध्यम वर्ग,उच्च मध्यम वर्ग अन श्रीमंत सर्व प्रकारच्या समाजातील मुलांमध्ये अशी भावना आहे.

जगण्याच्या या शर्यतीमध्ये धावताना ज्यांच्या साठी हे आपण करतोय तेच जर ही उद्याची ही जगण्याची शर्यत हारणार असतील तर आमच्या धावण्याला अर्थ तो काय?????



5 comments:

aativas said...

शाळेत असताना असा प्रकार मुलं करतातच! माहितीचा अभाव असेल किंवा लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असेल. पण मुळात एवढ्या सगळ्या मुला-मुलींना कथा लिहिता आली हेच मला प्रचंड सकारात्मक वाटतेय! मला नसती आली शाळेत असताना कथा लिहिता - अजून तरी कुठे येतेय म्हणा!!

हेरंब said...

नक्कीच भयावह परिस्थिती आहे. विचार करायला लावणारी !

श्रिया (मोनिका रेगे) said...


लेख छानच आहे. ह्यात जे काही आपण म्हंटले आहे ते मलाही वाटते.कुठेतरी एक खंत आहे कि प्रगती आहे पण त्यासोबत side effect म्हणून नको ते मुले शिकत आहेत. धावत्या जगात,सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस कसा संपतो कळत नाही आई वडिलांना.घरात चौकोनी कुटुंब,अगदी बरोबर! मुलांचे विश्व शाळा अभ्यास,क्लासेस,खेळायला वेळ असला तर थोडा वेळ मैदानी खेळ नाहीतर संगणक आहेच! शिवाय idiot box ....अजून सांगायला नकोच!
एक अनुभव आठवला, माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तब्बल ३ वर्षांनी गेले होते. जाण्याआधी एक फोन केला तर मला म्हणे "अग माझ्या मुलाचा अभ्यास असतो आणि मग तू ये"..म्हंटले चालेल आनंदच वाटला.जेव्हां मी गेले तेव्हां परिस्थिती अशी होती कि मुलगा समोर बसून अभ्यास करत होता आणि मातोश्री TV बघत त्याचा अभ्यास घेत होत्या.अर्थात त्यात मुलाचा अभ्यास किती होत असेल,कोण जाणे! मी जेव्हां ह्याबद्दल बोलले तेव्हां मला म्हणाली कि "अग झालाच आहे अभ्यास पण ह्या सीरिअल ची वेळ माझी चुकता कामा नये...तुला सांगते थांब ह्याची स्टोरी."..मी तिच्याकडे जितका वेळ होते सतत TV मात्र बाजूला चालू होता...आणि त्यावर मराठी,हिंदी मालिका..अश्या वातावरणात आई मुलांना कितीसा वेळ देत असेल?
असो...
मुलांनी कथा लिहिल्या हे कौतुकास्पद आहे.पण ह्या कथा त्यातल्या ज्या नकारात्मक वाटल्या त्या नेमक्या अश्या का लिहाव्याश्या वाटल्या असतील,असे एकेकाला विचारता आले असते तर!
त्यांच्या मनात तोचतोचपणा इतक्या लहान वयात येत कामा नये असे वाटले.
आनंद असावा, ताण नसावा..असला तरी इतर गोष्टी तो ताण हलका करू शकल्या पाहिजेत!बालमन आहे ते शेवटी!

मनमौजी मनातले बोललात ह्या लेखाद्वारे...धन्यवाद!

Yogesh said...

@ Savita@सविता ताई,हेरंब,श्रिया ताई....धन्यवाद.

भानस said...

सरसकट सगळ्यांना एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीच. बर्‍याच मुलांच्या घरातली परिस्थिती वेगवेगळी असेल. कुठे अति कडक वातावरण तर कुठे स्वातंत्र्याचे भोक्ते.

” ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी ’हे वाचल्यावर भीती वाटली. :(

बहुतांशी कथा या काल्पनिक असल्या तरी त्यात काहीसे खरेही उतरलेले असते. नकारात्मक अप्रोच लहानपणापासूनच अवतीभोवती दिसतो... दिसतच राहतो. :( :(